माझी गडगिरी भाग:- 17
पांडे पेडगांवचा धर्मवीर गड -
          मी तसा मुळचा श्रीगोंदा तालुक्यातील चांडगांव या गावचा पेडगांव आमच्यापासून हाकेच्या आंतरावर पण तरीसुध्दा कधी जाणं झालं नव्हतं इंदापूरला आल्यानंतर कधीतरी एकदा या धर्मवीर गडावर अर्थात बहाद्दर गडावर किंवा अर्थात पांडे पेडगांवच्या किल्ल्यावर जाव असं ठरवत होतो परंतु होत नव्हतं. आम्ही महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक असं दरवर्षी कुठल्यातरी किल्ल्यावर शिवजयंतीला अर्थात 19 फेब्रुवरीला कुठल्यातरी किल्ल्यावर सायकलने प्रवास करतो. मागच्या वर्षी हा प्रवास बहाद्दुरगड अर्थात पांडे पेडगांवला करायचा असं ठरलं आणि त्याप्रमाणे इंदापूर ते पांडे पेडगांव हे आंतर 70 कि.मी. पांडे पेडगांव म्हटलं की, पेडगांवचा शहाणा ही म्हण आपल्या लक्षात येते हा वाक्यप्रचार जो पडलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो बहाद्दुर खानाला जो चकवा दिला तेव्हापासून पेडगांवचा शहाणा असं संबोधलं जातं.
पेडगांवचा धर्मवीर गड हा भिमेच्या काठावर आहे. त्याच्यातील दक्षिणेकडील तटबंदी भिमा नदीला समांतर अशी आहे. साधारण आयताकृती आकाराच्या या किल्ल्याला तीन ते चार प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेश हा पेडगांव श्रीगोंदा मार्गावरील गावाच्या बाजूला आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वास्तू आजही दिसतात परंतु त्या अत्यंत उदवस्थ अवस्थेत आहेत. याची तटबंदी कशीबशी का हाईना पण उभी आहे. तरी सुध्दा वेडयाबाभळी अर्थात काटेरी रान माजलेलं सगळीकडं दिसतं. नदीच्या बाजूला तटबंदीमध्ये जे बांधकाम आहे ते आजही बघण्यासारखं आहे. या दुमजली इमारतीच्या खिडक्यांमधून भिमानदीचा देखावा अत्यंत सुंदर दिसतो. किल्ल्यामध्ये सुबक नक्षीकाम असलेली अनेक मंदीरे आहेत. या मंदिरापैकी लक्ष्मी नारायण मंदिर तसे आजही बऱ्या अवस्थेत आहे. अर्थातच पुरातत्व खात्याने जवळजवळ त्याचे पुनर्जिवीत केलेले आहे. या मंदिरामध्ये अलिंकृत स्तंभ तसेच मंदिरा बाहेरील मुर्ती हया अत्यंत सुबक, सुंदर व देखण्या आहेत.
या दुमजलीच्या इमारतीच्या खिडक्यांमधून भिमा तिरेवरचा देखावा अत्यंत सुंदर दिसतो. अर्थात सध्या खूप मोठया प्रमाणात वाळू उपसा आहे. तरीसुध्दा किल्ल्याच्या आतील अनेक गोष्टी बघण्यासारखी आहेत. जवळ जवळ 365 एकरामध्ये पसरलेला हा किल्ला असून किल्ल्यावर आजही अनेक विशेषत: प्राचीन अर्थात इ.स. पाचव्या शतकातील चालुक्य शैलीतील मंदिरं हत्तीच्या मोटा, राजदरबार, वेशी, तटबंदी आजही भग्न अवस्थेत आहेत.
छत्रपती संभाजी राजांना जेथे अत्यंत क्रुरपणे छळ केला गेला ती जागा दाखवली जाते. ती जागा बघताना अर्थातच अंगावर शहारे येतात. आणि डोळयातून अश्रु वाहायला लागतात. एका मंदिराचा कुठलातरी खांब एक स्तंभ म्हणून प्रतिकात्मक म्हणून ठेवलेला आहे. खंत एवढीच वाटते की येथे छत्रपती संभाजी राजांच मोठं स्मारक व्हायला हवं.
पेडगांवचा किल्ला जसा आकाराने लांबवर पसरलेला आहे. अर्थात पेडगांव गावच मुळात पेडगांवच्या किल्ल्यामध्ये वसलेलं आहे. बहाद्दुरखान हा औंरगजेबाचा दुधभाऊ मानला जातो. आणि त्याला जेव्हा दक्षिणेकडे औंरंगजेबाने पाठविलेलं होतं त्यावेळी तो स्वत:ला दक्षिणेचा शहिंनशा म्हणून घेत असे शिवराज्यभिषेकानंतर जो खर्च झाला तो अमाप झाला आणि तो खर्च भरुन काढयासाठी बहाद्दुर खानाने संधी राजांना त्या काळात दिली होती. ती जी हुलकावनी आहे ज्या पध्दतीने वेडा बनवलं गेलं त्यामुळचं पेडगांवचा शहाना म्हण प्रचलित झाली खरं तो पेडगांवचा वेडाच होता म्हणून आजही 400 वर्ष ती म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. छत्रपती संभाजी राजांच येथे जसं स्मारक व्हायला हवं म्हणजे स्मारक याचा अर्थ संभाजी राजांच्या लिखानावर, संभाजी राजांनी अनमोल आणि अप्रतिम लिखान केलं यावर एखादं ग्रंथालय व्हायला हवं, खर तर संभाजी राजांच एखादं अध्यासन येथे व्हायला हवं. आणि राजांवर संशोधन करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही जागा अप्रतिम आहे. त्यासाठी येथे प्रयत्न करायला हवेत केवळ एकच दिवस या गडाचं महात्म न राहता वर्षभर तेथे राजांबद्दल काही ना काही कृतीशिल कार्यक्रमांमधून म्हणजे चर्चासत्र, सेमिनार, वर्कशॉप, कार्यशाळा असं व्हायला हवं तेथे आजही पहाटे नगारा वाजविला जावा असं वाटायला लागतं आणि त्या पध्दतीने येथे स्मारक व्हायला हवं असं वाटतं.
जुन्या मंदिराचे जे खांब आहेत ते खांब काही घरांच्या बांधकामासाठी वापरलेले दिसतात खरं तर अत्यंत मेहनतीने चालुक्य काळामध्ये या वास्तु उभ्या केलेल्या होत्या. यातील विरगळी, सतीचे खांब हे अत्यंत बघण्यासारखे आहेत. मुर्तीशास्त्र जे आहे त्या शास्त्रातल्या अनेक मुर्ती शास्त्रोकत् पध्दतीने तयार केलेल्या त्या लक्ष्मी नारायणाच्या मंदिराच्या बाहेरील या मुर्ती आहेत. त्याचा निटअभ्यास व्हायला हवा. प्रत्येक मुर्तीचे जे अलंकार आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे कर्णालंकार जे आहेत ते प्रत्येक मृतीच्या कानातील अलंकार वेगवेगळे आहेत खरं तर याचा अभ्यास व्हायला हवा.
गडगिरीमध्ये गड तर बघुयात पण पेडगांव सारखे भुईकोट किल्ले सुध्दा महाराष्ट्रात अनेक आहेत. त्याला स्थलदुर्ग असं समजलं जातं. असे स्थलदुर्ग आडबाजूच्या आडवाटेच्या पायवाटेने जाऊन बघण्यासारखे आहेत.
सायकल वरुन गडावर गेलो तेव्हा जेवणाची आमची उत्म सोय बहाद्दुरगडामधल्या एका कुटुंबाने केली होती. आम्ही जवळ जवळ 150 जण होतो. आणि या सगळयांची सोय ही घरगुती पध्दतीनं उत्तम शाकाहारी जेवणांची सोय त्यांनी केलेली होती. तिथून पुन्हा परत जाताना सायकलवरुन 70 कि.मी. अंतर जायचं होतं त्यामुळं घाईघाईत थोडा गड बघायचा राहून गेला पुन्हा एकदा कधीतरी हा गड पुर्णपणे निवांतपणे बघण्याची इच्छा आहे.
चला तर गडगिरी करुयात गडगिरी बघुयात
       ज्ञानसुत
डॉ. संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट