गडगिरी I6

माझी गडगिरी भाग:- 16

*शितल आल्हाददायी कळसुबाई*

कळसुबाई म्हटलं की महाराष्ट्रातलं सहयाद्री रांगेतले सर्वात उंच शिखर अशी आपली धारणा होते आणि स्वाभाविकच आहे. अदमासे 1550 मीटर उंच अर्थात 5400 फुटावर असलेलं हे शिखर.  महाराष्ट्रातल्या सर्व ट्रेकर्सला कायम आकर्षित करणारं ठिकाण. तसा कळसुबाई शिखरावर मी चारदा गेलो. पण आठवणीत राहिलं ते श्रावणातलं वनसचेतन शिबिरा अतंर्गत केलेली गडगिरी आम्ही दोन गाडया करुन 150 जण भारतीय जैन संघटना महाविद्यालयातून 1997 साली कळसुबाईला गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. राजन वेळुकर यांनी वनसचेतन ही एक अफलातुन संकल्पना मांडली होती.
    आम्हाला आलं होतं ते भंडारदरा वन . भंडारदरा करुन  कळसुबाई करायचं असा सगळा योजनेचा भाग होता.
भारतीय जैन संघटनेचे कार्यवाहक श्री. डुंगरवाल आणि आम्ही 150 जण अस कळसुबाईला जायचं ठरलं. अतिशय उत्तम नियोजन आम्ही केलं होतं. आणि त्या प्रमाणे रात्री 11:00 वाजता पुण्याजवळच्या वाघोलीहुन  आम्ही निघालो. पहाटे पोहोचलो संगमनेरमध्ये आन्हीके उरकल्यानंतर पहाटे पाच -सव्वापाचला भंडारदऱ्याला  पोहोचलो. ठरलं की आधी कळसुबाई करायचं आणि मग मुक्कामाच्या ठिकाणी यायचं त्या प्रमाणे आम्ही कळसुबाई चढायला सुरुवात केली. 150 जण असल्यामुळे काही जण अगोदरच नाही म्हणाले. त्यामुळे 5-6 जणांचा चमू खालीच राहिला. बाकी सगळयांनी चढायला सुरुवात केली. श्रावणाचा महिना असल्यामुळे धुक्याचं मधूनच वावटळीसारखं येणं , मध्येच बारीकसा पाण्याचा शिरकावा.  थंडीचे दिवस आहेत म्हणून प्रत्येकाने तयारी केली होते म्हणजे स्वेटर, मफलर अशी पुर्ण तयारी होती. तासभर चालल्यानंतर इतकं घामाघूम झालो की आमचं आम्हाला जाणवायला लागलं की, हे आपण उगचच लटांबर सगळं घेतलेलं आहे. मग कुणी स्वेटर काढून कंमरेला बांधलं. मफलरी तर कधीच काढल्या होत्या. टोप्या कधीच काढल्या होत्या. मग असं मजल दरमजल करीत वर चढत होतो. कळसूबाई चढताना काही पायऱ्या लागतात हया पायऱ्या म्हणजे छातीत धडकी भरणाऱ्या आहेत कारण 30-35 पायऱ्या आहेत पण त्या ढोपराएवढया उंचिच्या आहेत. मध्ये आम्ही थांबलो आणि बरोबर जो नाष्टा आणला होता तो खाल्ला पुढे गेलो, तिथे 03 शिडया लागतात पहिल्या शिडीवर चढलो. शिडी ही अत्यंत घट्ट रोवलेली आणि शिडी चढतोय म्हटल्यानंतर सोपं काहीतरी आहे असं वाटलं.जसजशी शिडी चढायला मुलं लागली तसतसे पायात गोळे यायला लागले आणि वर गेल्यांनतर असं लक्षात आलं की हे दिसतं तेवढं सोपं नाही. अशा तिन्ही शिडया पार केल्या आणि तिसऱ्या शिडीच्या नंतर मधल्या भागात एक विहीर लागते या विहीरीचं पाणी हातानं घेता येईल इतकं जवळ आहे.
कळसुबाईच शिखर हे जसं महाराष्ट्रातलं उंच शिखर. वास्तविक 5000 फुटाच्या वरची महाराष्ट्रात फक्त 03 शिखरे आहेत. त्यापैकी हे सगळयात उंच शिखर. विहिरीचं पाणी इतकं थंड गार आहे की आपण बर्फ खातोय की काय अशी भावना आपली होते. आणि म्हणूनच अतिशय थंड, शुध्द, निर्मळ तळ दिसणांर विहिरींच पाणी अत्यंत गोड चवीच असं पाणी पिऊन समोर बघितलं तर कळसुबाईचा माथा दिसतो.
विहिरीचं पाणी पिऊन वरती कळसुबाईकडे बघितलं तर माथा अत्यंत जवळ टप्यात आल्यासारखा दिसतो अर्थात वळणा वळणानं जावं लागतं थोडा जास्त वेळ लागतो. पण गड चढल्याचा जो आनंद आहे. तो असल्यामुळे पाय मी म्हणत असले तरी पायाला गोळे असले तरी आपण भराभर वर चढायला लागतो. कळसुबाईच्या शिखरावर 1000 माणसं बसतील एवढी जागा आहे. परंतु कळसुबाईच्या मंदीरात मात्र 3 ते 4 जण थांबू शकतील अशी व्यवस्था आहे. तिथे अनेक घंटया टांगलेल्या दिसतात. कळसुबाई मंदीराच्या मागच्या बाजुला गेलं आणि जर वातावरण निरभ्र असेल तर पलिकडे अलंग मलंग त्याच्यापलीकडे रतनगड आणि हरिश्चंद्रगड साम्रद खिंड किंवा इकडे भंडारदऱ्याचा जलाशय असं सगळं बघायला मिळतं. टाकेत दिसतं तिकडे इगतपुरी आणि नाशिकच्या इंड्रस्टीजचा बेल्टचा काही भाग आपल्याला दिसतो.
गडावर गेल्यावर जसं अल्हाददायी प्रसन्न वाटतं, तसंच अतिशय भाराऊन जाणारं, श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे दुलईसारखी मखमली रंगाची हिरव्या रंगाची चादर परसलेली पृथ्वीने स्वत:ला लपेटून घ्यावं असं वातावरण असतं. मधूनच पावसाच्या सरी येतात. बालकवींची श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या कवीतेची आठवण येते. आणि एवढं सगळं करत आम्ही खाली उतरलो. खाली उतल्यानंतर अर्थातच काही प्रश्न उभे राहिले. ते म्हणजे हे महाराष्ट्रातलं सगळयात उंच शिखर पण येथे शिडीचा भरावसा आहेच परंतु आता नव्याने पुन्हा काही शिडया केलेल्या आहेत. आत्ताच मी मागच्या वर्षी जाऊन आलो होतो. काही शिडया भक्कम केलेल्या आहेत. पण तरीसुध्दा वाट अजून जशी ट्रेकर्स ला जशी हवी तशी निटशी नाही. अर्थात अपघातासारखी वाटत नाही परंतु वाट चांगली असायला हवी. किमान काही ठिकाणी पायऱ्या करणं गरजेचं आहे. विशेषत: यात्रेचं स्वरुप आल्यामुळे येथे यात्रेचं आपत्ती व्यवस्थापन गरजेचं आहे. कारण मांढरदेवीला जशी दुर्घटना घडली तशा प्रकारची येथे घडू शकते. ती घडू नये म्हणून कळसुबाईचा वरचा जो माथा आहे त्या माथ्यावर सगळयाच बाजून उंच रेलींग करणं आवश्यक आहे. अर्थात वरुन लोक काही गोष्टी खाली फेकुन देतात. विशेषत: प्लॅस्टीकचा कचरा . बाटल्या आणि कचरा  त्या फेकु नये म्हणून तेथे उंच जाळी लावता येईल का ?जेणेकरुन प्लॅस्टीक गडावरुन लोक खाली फेकणार नाहीत कारण हे फकलेलं अडचणीचं ठरते विशेषत: प्राण्यांना या भागात अनेक प्राणी, पक्षी आहेत विशेषत: माकडांच प्रमाण आहे. येथे बिबटया बऱ्याचदा असतो म्हणजे कळसुबाईच्या मागच्या बाजुला वाघ झरा आहे अथार्त तिथं वाघाचं अस्तित्व असावं असा अंदाज बांधण शकय आहे निरनिराळया प्रकारची माकडं आहेत. निरनिराच्या प्रकारचे पक्षी आहेत आणि या सगळयांना प्लॅस्टीकचा त्रास होऊ नये म्हणून आपण सगळयांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
खरं तर आमचं हे वनसचेतन शिबिर होतं. आणि जसा ट्रेक झाला तसंच पुन्हा आम्हाला वनखात्याच्या सामाजिक वनीकरणाच्या एका गेस्ट हाऊसमध्ये सोय केलेली होती. आम्ही तेथे सगळे थांबलेलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी भंडारदऱ्याच्या नावेमध्ये बसून रतनगड च्या पायथ्याला अमृतेश्वराचं दर्शन घेऊन आलो होतो. अंबरेला फॉल, रंधा फॉल हे सगळं बघितलं होतं. हा परिसर आणखी जास्त चांगला होऊ घातलांय म्हणजे दोन्ही बाजुंनी अमृतेश्वराला गाडीनं आणि  नावेनं असं जाता येतं. म्हणजे भंडारदऱ्याला वळसा घालता येतो. काजवा महोत्सव अतिशय महत्वाचा मानला जातो. मागच्याच महिन्यामध्ये मी भंडारदऱ्याला गेलो हातो. आणि भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव हा खरचं एक सोहळा आहे.ज्यांनी कटयार काळजात घुसली हा चित्रपट बघितलाय त्याला काजवा महोत्सव काय असू शकतो याची जाण येऊ शकते.  हा काजवा महोत्सव म्हणजे छोटे छोटे लुकलुकणारे दिवे आणि लाखोच्या संख्येने या दिवसात तर ते हमखास दिसतात. ते ही बघता येतं आणि वनसचेतन मध्ये हे सगळं बघायचं असा आमचा प्लॅन होताच तसं सगळं बघून आम्ही मुक्कामाल थांबलो अतिशय उत्तम जेवणाची व्यवस्था सामाजिक वनीकरण खात्यांन केलेली होती. ती झाल्यानंतर मुलांना उत्साह होता पाण्यामध्ये डूंबायचा भंडारदऱ्याच्या पायथ्याला अतिशय सुंदर जागा आहे तेथे आंघोळी करता येतात. अर्थातच आम्ही सगळयांनी तो आनंद घेतला. आणि कळसुबाईचं दर्शन हे माझ्या कायस्वरुपी मनात कोरलं गेलं. कळसुबाई खरं तर आणखी विकसीत व्हायला हवं म्हणजे रोपवे करता येतील का? म्हणजे उंच शिखरावर जाण्यासाठी सहजासहजी जाता येईल का?. रोपवे करता येऊन मग मध्ये काही सोय करता येईल का ?कळसुबाईला आजही अतिशय गरमा गरम भजी मिळतात. एक आजी छान भजी करुन देतात किंवा ताक ही छान मिळतं पण आणखी काही  जेवणाच्या उत्तम सोयी असाव्या लागतात. त्यासाठी काही सोयी करता येतील? हॉटेल्स उभारता येतील का ?असे सगळे प्रश्न आहेत चला तर ही सगळी देवस्थानांची ठिकाणं विकसीत करण्याकडे लक्ष देऊयात. प्लॅस्टीक आणि कचरा निर्मुलनासाठी प्रयत्न करुयात केवळ गडगिरी करायची म्हणून करायची नाही तर प्रदुषण पण करायचं नाही?  हेही आपण ठरवायला हवं.

     *ज्ञानसुत*
डॉ. संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट