*माझ्या वजनाची कहाणी*
माझ्या वजनाची कहाणी
जुन _ जुलै ऑगस्ट २०१८, प्रवेशाची धावपळ - आमचे बैठे काम ' तासन तास बसायचे . आल्या गेल्या पाहुण्यांना ' पालकांना चहाचा आग्रह तर कधी त्यांच्याकडून फक्कड चहाची ( आले मारके ) फर्माईश . त्यांच्या बरोबर *एकच घोट* करत करत दिवसभरात १०- १२ कप दुधाचा चहा साखरे सह रिचवायचा, हा शिरस्ता . [ इंदापुरचा चा म्हणजे काकवीच] मधुनच कधी पोहे तर गणेशची खेकडा किवा गोल भजी, थालीपीठं . पोहे वा उपमा, डॉ बिरादारानी प्रेमान खाऊ घातलेला सुशीला . डिगाची मिसळ वा साखरेच्या पाकात घोळवलेला ख्वाजा . संध्याकाळी आढावा बैठकीत उगीचच कुणाचं तरी कौतुक करून इंदापुरात गाडयावर छान मिळतो म्हणून रिचवलेला वडापाव . कधी नामा/ नाना शिंदेची मावा कुल्फी, कुणाच्या तरी वाढदिवसाला केक, गेला बाजार पेढे वाटणारी मुलं काही कमी नाहीत आला पेढा की खाल्ला.
कधी भांडगांव च्या म्हसोबाची जत्रा तर पाहुणे आले की चिलापी मासे ठरलेले . एक ना अनेक कितिदा खानं व्हायचं याला सुमार नसायचा .
व्हायचं तेच झाले . पेरुच्या आकारात पोटाचा नगारा ४० " वर जाऊन पोचला . वजन ७० किलो . ( माझी उंची अदमासे १६० cm वजन हवे फक्त ६० ते ६५ Kg च्या दरम्यान )
ऑगस्ट २o१८ मध्ये संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी साठी श्री राजेशजी पांडे , श्री प्रसेनजीत फडणविस . डॉ प्रभु देसाई ' श्री शिवले ' सौ भाग्यश्री ताई मंठाळकर आले होते .
छान सुग्रास जेवणाची सोय आम्ही केली होती जेवण करताना भाग्यश्री ताई म्हणाल्या की *मी काही खाणार नाही* मला ताक मिळाले तर तेव्हढे पुरे .
दुपारची कडकडीत भुकेची वेळ . आणि या बाई चक्क म्हणतात मला फक्त ताक पुरे ! तसेच सहज प्रश्न पडला का ?
त्या म्हणाल्या नाही *मी सध्या दीक्षित डायट प्लॅन* करते .
पुढच्याच आठवड्यात डॉ . स्नेहल अग्निहोत्री महाविद्यालयाच्या एका कामानिमित्त आल्या होत्या . जेवताना त्यांनीही तसेच सांगितलं मी दीक्षित पाळते, प्रा तुषार रंजनकर संध्याकाळी जेवणाच्या वेळी माझ्या घरी आले आणि मी जेवणाचा आग्रह करायला लागलो तर म्हणाले नाही नाही मी दीक्षित पाळतोय मग सुरू झाला माझा एक प्रवास ?
काय भानगड आहे दीक्षित? याचा शोध घेण्याची ?
तत्पूर्वी ऋजुता दिवेकर, वा येनकेनप्रकारे वजन कमी करण्यासाठी मी उपाय केले होते . रोज व्यायाम करणं . बाबांची फासफुस कपालभातीपासून काय काय नाना उपाय . ग्राउंडवर चकरा मारणे, दोरीच्या उड्या, डॉक्टर त्रिपाठींची स्मूदी इत्यादी, तीन-चार दिवस उत्साहात टिकले पण नंतर टिकले नाही . ज्यावेळी डॉक्टर दीक्षित, डॉ जगन्नाथ दीक्षित ऐकत गेलो आणि मग क्लिप्स पाहिल्या
आणि ठरले की आपणही पाळू शकतो आणि केली सुरुवात 16 ऑगस्ट पासून म्हणजे माझ्या वाढदिवसापासून.
पहिले काय झालं तर चहा शून्य झाला. किती चहा व्हायचा काही सुमारच नसायचा त्यात तो दुधाचा चहा असल्यामुळे झालं असं की acidity प्रचंड वाढायची.
दीक्षित प्लॅन नुसार दोन वेळेस जेवण करायच, अर्थात तेही जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत जेवायचं नाही. चारच्या सुमारास रोजच्या सवयीप्रमाणे पुन्हा खावंसं वाटलं पण मनाचा ठिय्या केला नाहीच खायचं. आणि मग सव्वा आठ ला मात्र कडकडीत भूक लागली आणि जेवलो मग काय गेली पाच महिने मी दररोज जेवणाच्या वेळा पाळतो आहे .हा शिरस्ता गेल्या पाच महिन्यापासून पाळतोय फार तर हा तीन-चार वेळा मोडला गेला असेल परंतु दोन वेळचे जेवायचं हा मात्र सवयीचा भाग होऊन बसलाय. रोज दुपारी साडेबारा ते रात्री साडेनऊ वाजता जेवायचे जेवायला बसल्यावर पुढची 55 मिनिटात मनसोक्त काहीही खायचे.
तशी दीक्षितांची पद्धत
अतिशय सोपी आहे, दोन वेळा जेवायचं एकदा जेवायला बसले की पंचावन्न मिनिटात जेवण पूर्ण करायचे आणि रोज एकदा सकाळी किंवा संध्याकाळी 45 मिनिटात साडेचार किलोमीटर चालायचं किती सोपी आहे ही पद्धती वास्तविक दोन वेळचा उपवास दिवसाचा उपवास आठ तासाचा तर रात्रीचा उपवास 16 तासाचा. ही दोन आवर्तन पाळायची. आता जगभर उपवासाच्या या सर्व यंत्रणेला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे.याबाबतीत जपानच्या एका शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिकही मिळाले आहे
आपल्याकडे आयुर्वेदात तर जैन धर्मिय किंवा बौद्धधर्मीय यांच्या मध्ये एकभुक्त व्रत पाळले जात होते. म्हणजे एकदाच जेवायचं एवढं कशाला आजही गावाकडे सकाळी साडेसातला पोटभर खाऊन पुन्हा रात्री दिवस मावळायच्या वेळेस जेवण करायचे दिवसभरात पाण्याव्यतिरिक्त काहीही न खाणारी अनेक माणसं शंभर शंभर वर्षे कसलाही आजार नसलेली जगतांना पाहिलेले आहेत.
या दरम्यान मी मधून मधून Fasting Insuling, HBA1C, वजन, पोटाचा घेर यावर लक्ष ठेऊन होतो. या सर्व कालावधीत माझे HBA1C 5.7 वरून 5.5 अर्थात प्री वरून नाॅन डायबेटीक झाले. Fasting insulin 7आहे जे11होते. *वजन 70.3 वरून 63.6 झालं*
(हे वजन लग्नाच्या वेळी ९५ साली होते ) पोटाचा घेर 40inch वरून 34 Inch झाला आहे. सपाटून भूक लागणे गेल्या 20ते 25 वर्षात विसरून गेलो होतो. कारण सातत्याने काहीना काही खाणे चालू असायचे. आता तसे होत नाही. आता दुध व साखरेचा चहा शुन्य झाला आहे. त्यामुळे अॅसिडिटीचा ञास शुन्य झाला आहे. पोटाचे विकार जळजळणे, डंम्बरणे, घट्ट होणं थांबले आहे.
मुळातच काय एकंदरीत क्रियाशक्ती वाढली आहे. दिवसभर उत्साही व हलकेहलके वाटते.
आपले आयुर्वेद, जैन धर्मियांच्या पद्धती , गौतम बुद्धाचे एकभुक्ता व्रत, डाॅ. श्रीकांत जिजकारांनी याचे केलेले पुनरुज्जीवन व डाॅ जगन्नाथ दिक्षितांनी चालवलेला वारसा भारताला स्वास्थ्य निर्माण करेल याची खाञी वाटते.
*चला तर मग दिक्षित आहार शास्त्राचे पालन करूयात*.
*जय जगन्नाथ*
*ज्ञानसुत*
संजय चाकणे